नारायणगाव | सेंद्रियखत म्हणून कृषी दुतांनी बनवलेले जीवामृत शेतकऱ्यांना फायदेशीर…
कृषीदुतांनी शेतकऱ्यांसाठी जीवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक केले सादर..
नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) :
मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक शेतीचे महत्व व सेंद्रिय शेती कशा पद्धतीने फायदेशीर आहे याविषयीची प्रात्यक्षिके कृषी दुतांनी नुकतीच सादर केली.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी येथील कृषीदुतांनी आदर्श गाव मांजरवाडी येथे जीवामृत कसे बनवावे या विषयावर प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले. शेतकऱ्यांमध्ये जीवामृताचे महत्त्व यासंबंधी जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
जीवामृत हे जैविक खतांमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे व त्याच्या वापरामुळे पिकांची वाढ जोमदार होते व उत्पन्नात वाढ होते अशी माहिती कृषीदूतांनी दिली.
मातीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते. जीवामृत हा रासायनिक खतांसाठी एक उत्तम पर्याय आहे अशी माहिती कृषी दूत अथर्व देशमुख,अनुराग वानखडे, केशव गोगडे, तपन जैन यांनी दिली. या कृषी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक भाग्योदय खोब्रागडे , कार्यक्रम समन्वयक अविनाश खरे, एच पी खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.