आम्हाला एकटं लढायचंय; काँग्रेसची मविआत कोंडी ?
दि. ०५/०१/२०२३
मुंबई
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या काळात काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट आमच्यासाठी जेवढ्या जागा सोडेल, तेवढ्या जागांवर लढण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान या संदर्भात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.राज्यातील आणि देशातील एकूण परिस्थिती बघता, युतीबाबत महाविकास आघाडी म्हणून काही निर्णय होत असेल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. काही दिवसांपूर्वीच मल्लिकार्जून खरगे यांच्याशी माझी भेट झाली. त्यावेळी मी त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकट्याने लढू द्यावे, अशी विनंती केली होती. मात्र, मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की जर याबाबतीत केंद्रीय नेतृत्वाने युतीचा निर्णय घेतला, तर तो निर्णय मला मान्य असेल; आम्हाला मान्य करावाच लागेल असं भाई जगताप म्हणाले.एकूणच काँग्रेस युतीसोबत लढण्यास इच्छुक नाही हे भाई जगतापांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.