Maval | गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे…आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश..

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे

आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण, दि. 25 एप्रिल – गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

उरण तालुक्यातील आपटा गावातील पंचायत समिती सदस्य तनुजा टेंबे, संजय टेंबे, आपटा ग्रामपंचायत सरपंच मयूर शेलार, माजी सरपंच दत्ताशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी काल (बुधवारी) आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत खासदार बारणे बोलत होते.

व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, भाजपाचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य जीवन गावंड, ज्ञानेश्वर घरत, भाजपचे जिल्हा विभाग अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अविनाश गाताडे, वारतांबे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, तालुकाप्रमुख बाळाराम नाईक तसेच विद्या जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, गोरगरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना जाते. कर्जत तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, वीज पोहोचवण्याचे काम आपण केले. केंद्रातील व राज्यातील महायुती सरकार अत्यंत संवेदनशील आहे. गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी लोकांनी हे सरकार पुन्हा यावे यासाठी महायुतीला मतदान करून पाठबळ देण्याची गरज आहे.

पनवेल ते जेएनपीटी दरम्यान आठ पदरी रस्ता बनवून या भागातील वाहतुकीची समस्या या सरकारने सोडवली आहे. चौक ते जेएनपीटी दरम्यान साडेचार हजार कोटी रुपये खर्चाचा नवा रस्ता बनवण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, अशी माहिती बारणे यांनी दिली.

विरोधी पक्ष हे व्यावसायिक पद्धतीने काम करत असून बोलण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळातून खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *