अजित पवारांना 70 हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात नाहक बदनाम केले – जयंत पाटील
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२
जलसंपदा मंत्री असताना महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाद्वारे ओलिताखाली आणून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चांगले दिवस अजित पवार यांनी आणले. परंतु सिंचन विभागातील ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात अजित पवार यांना नाहक बदनाम करण्यात आले. सिंचन क्षेत्रात त्यांनी केलेले काम मोलाचे आहे. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले हे महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी काढले.
पुरंदर पब्लिसिटीतर्फे ‘कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचे : अजितदादा पवार’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते. या प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, विजय नवल पाटील, उल्हास पवार, अशोक मोहोळ, अंकुश काकडे, प्रशांत जगताप, दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, उमेश पाटील, विजय कोलते उपस्थित होते. पाटील म्हणाले, टीका सर्वांवर होते. पण, लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली हे महत्त्वाचे आहे. सर्वांना न्याय देणे शक्य नसते.