राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्रित खंजीर हे चिन्ह द्यायला पाहिजे होतं – गोपीचंद पडळकर
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाला पत्र लिहिलं आहे. आमच्याबरोबर दुजाभाव केला जात असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या या पत्रानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल चिन्ह देऊन चूक केली आहे. आयोगानं त्यांना खंजीर हे चिन्ह द्यायला पाहिजे होतं, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. उद्धव ठाकरेंबरोबर कसला दुजाभाव केला आहे? खरं तर, निवडणूक आयोगाकडे आम्हीच विनंती करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचं विलीनीकरण करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना लोकांमध्ये सहजपणे जाता येईल. कारण मशाल चिन्ह रुजवायला त्यांना वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लगेच लक्षात आलं असतं.