‘स्वत:च्या घराला आग लागलेय अन् शेजारच्या गावातल्या धुरासाठी बोंबा मारताहेत’ गोपीचंद पडळकर यांची टीका
राजू थोरात
सांगली जिल्हा प्रतिनिधी
११ ऑक्टोबर २०२१
सांगली
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांतील दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भाजपनं मात्र हा बंद फसल्याचा दावा केला आहे. तसंच, महाविकास आघाडीवर जोरदार टीकाही केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे. ‘लखीमपूर घटनेबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती व सहवेदना आहे. त्यामुळंच या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. उत्तर प्रदेशचे आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सक्षम नेते आहेत. शेतकऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणात ते निश्चितच कठोर कारवाई करतील. आघाडीच्या नेत्यांनी त्याची चिंता करू नये. जनाब संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल बोलावं,’ असा टोला पडळकर यांनी हाणला आहे.