बळीराजावर आभाळाची पुंन्हा अवक्रुपा,पावसाने फिरवली पाठ ,दुबार पेरणीचे संकट पुंन्हा उभे…
ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
दि.६ जून २०२१ ( ओझर )
यावर्षी महाराष्ट्रात सर्वदूर मृगाचा पहिला पाऊस चांगला पडल्याने शेतकरी राजा सुखावून गेला होता. एकीकडे कोरोनाच्या महामारीने शेतीमालाला कवडीमोल किंमत मोजावी लागत होती.काहींना तर पीक कर्जापोटी आत्महत्या केल्या होत्या. निदान हे वर्ष तरी चांगले जाईल या भरवश्यावर निसर्गाने देखील पहिली सुरवात चांगली केली होती. क्रुषीतज्ञांच्या सल्ल्यानुसार जोपर्यंत महाराष्ट्रात ७० ते ८० मि.मि.पाऊस पडत नाही किंवा समाधान कारक पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये ,अन्यथा दुबार पेरणीचे महासंकट उभे राहिल असा सल्ला क्रुषीतज्ञांनी दिला.
परंतु शेतात चांगला वापसा झाल्यानंतर शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला ,पेरण्या झाल्या पण गेली दहा बारा दिवस झाले वरुणराजा काही बरसला नाही.सर्वच वेधशाळांचे अंदाज चुकले असून, पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने व शेतातील पिके करपू लागलयाने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. जुलै महिन्यातही कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरीही हैराण झाला आहे. तसेच मानव निर्मित प्रदुषणामुळे,हवामान बदलाचा परिणाम मांन्सूनवर झाला आहे. त्यामुळेही पाऊस लांबत चाललेला आहे. या सर्व बदलांचा परिणाम शेतीक्षेत्रावर जास्त प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे राज्यभरातील शेतकरीराजा चिंतेत पडला आहे.
शासनाच्या वतीने करोडो रुपयांचा खर्च वेधशाळांवर होत आहे.तंत्रज्ञान एवढे पुढे गेलेले असतानाही निसर्गाने सर्वच अंदाज फोल ठरवले आहेत. पण यामध्ये सर्व सामान्य शेतकरी वर्गाचा मात्र बळी जात आहे…….
शासनाचे बेजबाबदार शेती मालाचे धोरण, आणि निसर्गाचा लहरीपणा यात जगाचा पोशिंदा मात्र कायमच भरडला जात आहे.बळीराजा पावसा अभावी पुन्हा एकदा संकटात सापडला असून, चढ्या भावाने खरेदी केलेले बियाणे व खते वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता दुबार पेरणीची टांगती तलवार बळीराजाच्या मानगुटीवर बसली आहे.
निसर्ग निर्मित व मानव निर्मित अशा दोन्हींच्या कचाट्यात हा जगाचा पोशिंदा आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. जर येत्या दोन -तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर बळीराजावर दुबार पेरणीचे संकट येऊन यंदाची पेरणी वाया जाणयाची शक्यता आहे.