संकटात जे पक्षासोबत राहतात त्याला निष्ठा म्हणतात; गजानन किर्तीकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर राऊतांची प्रतिक्रिया
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२
खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा धक्का वगैरे काही नसल्याचं स्पष्ट केलं.
गजानन कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. पाचवेळा आमदार राहिले. दोन्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिले. दोनवेळा खासदार राहिले, असं सांगत संजय राऊत यांनी कीर्तिकर यांना दिलेल्या पदांची जंत्रीच वाचून दाखवली. कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर शिवसेनेसोबत आहेत. अमोल हे कट्टर शिवसैनिक आहेत. उम्र की पडाव की बात है. आणखी काही नाही. अमोलने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाहीत, असं त्यांनी सांगितलं. न्यायाची व्याख्या काय? मला तर चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकलं. तरीही मी पक्षात आहे. संकटात जे पक्षासोबत राहतात त्याला निष्ठा म्हणतात. कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते. फार फार मोठी सळसळ झाली असं काही नाही. गेले ठिक आहे. उद्यापासून लोकं त्यांना विसरून जातील, असं राऊत म्हणाले.
आमची दिशा योग्य आहे की नाही हे जनता ठरवेल. अंधेरीच्या निवडणुकीत पाहिलं, दिशा कोणती योग्य आहे ते दिसलं. याच परिस्थितीत आमचं चिन्हं गेलं आणि पक्षाचं नाव गेलं. तरीही 68 हजार मते पडली. लोकांनी मतं दिली. ही दिशा योग्यच आहे. आता मशाल, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पुढे जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.