चंद्रकांत पाटील यांचा पुणेकरांना दिलासा; 10 दिवस वाहतूकीचा दंड नाही
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना दिलासा दिला आहे. दिवाळीच्या काळात पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. पुढील १० दिवस पुणेकरांकडून कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस वाहतूक नियमातून नागरिकांना शिथिलता देण्यात आली असून कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली. त्यामुळे पुणे शहरात प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनाची गती कमी होत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वेगळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सुरुवातील शहरातील रस्ते नीट करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी शहरातील 400 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. १० दिवस कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.