सा. कार्यकर्त्या वैशाली चव्हाण/कटके व ज्ञानदेव चव्हाण गुरुजी यांच्या मुलाचा (चैतन्य) अपघाती मृत्यू..
सा. कार्यकर्त्या वैशाली चव्हाण/कटके व ज्ञानदेव चव्हाण गुरुजी यांच्या मुलाचा (चैतन्य) अपघाती मृत्यू..
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : ०९/०१/२०२४.
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली ज्ञानदेव चव्हाण (कटके) व ज्ञानदेव चव्हाण गुरुजी यांच्या चैतन्य या धाकट्या मुलाचा, सोमवार दि. ८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान, वाघोली जवळील कटके वस्ती जवळ नगर – पुणे हायवे वर अपघात होऊन मृत्यू झाला.
कु. चैतन्य हा अतिशय हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. त्याने ॲनिमेशन ची डीग्री घेतल्यानंतर तो विमाननगर येथील एका कंपनीत कामाला होता. नेहमीप्रमाणे चैतन्य हा सकाळीच त्याच्या वाघोली येथील निवासापासून विमाननगरकडे आपल्या दुचाकीवरून जात असताना, त्याला एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तेथील वाटसरुंनी व बघ्यांनी दिली. त्याच्या जवळ असणाऱ्या ओळख पत्रांनुसार त्याच्या घरच्यांचा शोध घेण्यात आला.
चैतन्यचे वडील हे शिरूर तालुक्यातील कासारी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून, आई सामाजिक कार्यकर्ता असून एका संस्थेत कार्यरत आहेत. दोघेही शिरूर तालुक्यात सुपरिचित असल्याने, अपघाताची खबर मिळताच अनेक आप्तेष्ट व स्वकियांनी पुणे येथील ससून रुग्णालयात धाव घेतली. हे कुटुंब सध्या शिरूर बायपास वरील श्रीराम पंचमी सोसायटी मध्ये वास्तव्यास असल्याने, सोसायटी मधील गिरीगोसावी, भोसले, सुर्यवंशी, बांदल, वाळुंज तसेच येथील बऱ्याच रहिवाशांनी लागलीच ससून येथे धाव घेत त्याच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
चैतन्यची मोठी बहीण अपूर्वा ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती देखील पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये काम करते.
चैतन्याच्या अपघाती मृत्यूची शिरूर करांना खबर लागताच सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळल्याचे दिसत होते. मात्र अपघातात चैतन्याचा मृत्यू झाल्याची खबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्या आईला दिलेली नव्हती. ज्यावेळी त्यांना चव्हाणवाडी (गोलेगाव) दिशेने नेण्यात आले, तेव्हा मात्र त्यांना त्यांचे बंधू अनिल कटके यांनी सत्य परिस्थिती सांगितली. त्यामुळे त्यांना हा प्रचंड मोठा धक्का असल्याने फार मोठा आक्रोश झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. अशा आक्रोशात व प्रचंड तणावात त्याच्या पार्थिवावर संध्याकाळी ६.१५ वा. त्याच्या मूळगावी चव्हाणवाडी (शिरूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह, त्याचे हिंगोली येथे पोलीस विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत असलेले मामा अनिल कटके व गोलेगाव येथील मामा सचिन कटके, योगेश कटके तसेच सर्व नातलग, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैतन्याच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.