छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते – देवेंद्र फडणवीस
३१ डिसेंबर २०२२
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा असं म्हटलं होतं. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं. राष्ट्र धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचं रक्षण त्यांनी केलं, असं ते म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसल्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले, धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारलं? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते.