चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, महाराष्ट्रात खबरदारी काय? – अजित पवार
२१ डिसेंबर २०२२
कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझिल या देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरु झाली. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्नांना अॅडमिट करण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य सचिवांनी काल नव्या व्हेरियंटविषयी तपास आणि काळजी घेण्याचं आवाहन सर्व राज्यांना केलं आहे. त्यात आपलंही राज्य असेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करता चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपॉवर कमिटी किंवा टास्कफोर्स आणि जगभरात काय केलं जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहे का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात विचारला.
नवीन व्हेरियंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाकी कोणती यंत्रणा तात्काळ उभी करायची याचा अनुभव त्यावेळच्या प्रशासनाला आहे. आपण त्याकाळी सहकार्याची भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. आपण जम्बो सेंटरची उभारणी केली होती. हा तातडीचा विषय वाटत आहे. याचा विसर कोणत्याही सदस्याला होऊ नये. सरकारने याबाबत काळजी घ्यावी, असा सल्लाही अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच एखादी समिती किंवा टास्क फोर्स तयार करण्यात येईल जो अपल्याला जगभरातील बाबींचे अपडेट देत राहिल.