दिल्लीही आज दुर्बिनीतून पाहत असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे – संजय राऊत
१७ डिसेंबर २०२२
मुंबई
महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत हाच महाराष्ट्राचा सर्वात मोठा अपमान आहे. राज्यातील साडेअकरा कोटी लोक हे सरकार कधी उलथवून टाकणार याची वाट पाहत आहे. हा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथवून टाकण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. गावागावात या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत. या मोर्चानं इशारा दिलाय की शिंदे फडणवीस सरकार, तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे. आज महाराष्ट्र एका रंगात न्हाऊन निघाला आहे. या मोर्चात शिवसेनेचा झेंडा आहे. राष्ट्रवादीचा झेंडा आहे. काँग्रेसचा झेंडा आहे. डाव्यांचा झेंडा आहे. समाजवादी पार्टीचा झेंडा आहे आणि तिरंगा झेंडाही आहे. आपण सर्व एका रंगात न्हाऊन निघालो असून आता आपल्याला समोर दिसणारा रावण गाडायचा आहे. रणनिती ठरली आहे. रणशिंग फुंकले आहे. शंख फुंकले आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली आहे. आता विचारांचे आणि एकतेचे वादळ घोंघावू लागले आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आजचा मोर्चा सांगतो की महाराष्ट्राच्या जनतेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केले आहे. या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा, डॉ. आंबेडकरांचा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? पाहा या मोर्चाकडे. आज दिल्लीही दुर्बिणीतून बघत असेल की महाराष्ट्राची ताकद काय आहे. आज महाराष्ट्र पेटलाय. ही ठिणगी पडली आहे, असा इशारा राऊतांनी दिला आहे.