महाविकास आघाडीच्या महामोर्चातून अजित पवारांचा भाजपा-शिंदे गटावर हल्लाबोल
१७ डिसेंबर २०२२
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे भाजपा सरकारवर टीका केली आहे.
काही महिन्यांपूर्वी जे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. दुर्देवाने महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला तरी जेव्हा महाराष्ट्रावर संकट असतं, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उटतो आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आज कार्यकर्ते मोर्च्यासाठी दाखल झाले आहेत. मुळात ही वेळ यायला नको होती. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत जी अपमानस्पद विधानं केली जात आहेत, त्याला कुठं तरी विरोध केला पाहिजे. शिवराय आपले दैवत आहेत. शाहू, फुले आंबेडकर आपला अभिमान असताना त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्याचे काम कशासाठी सुरू आहे? कोण यामागे सुत्रधार आहे, याच शोध घेतला पाहिजे. चुकीचे विधान एखाद्या वेळेस होऊ शकते, त्यानंतर माफी मागणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही आपली पंरपरा आहे. मराठी माणसावर तसे संस्कार झाले आहेत. मात्र, आज तसे होताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर दुसरे मंत्री बोलतात. कोणी महापुरुषांच्या महान कार्याला भिकेची उपमा देतात. जनाच नाही तर किमान मनाची लाज वाटायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.