न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाद नको,अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश
१५ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावर निर्माण झालेल्या वादावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली.
सीमेवरुन जो वाद निर्माण झाला होता तो संपवण्यासाठी मी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आणि इतर महत्त्वाच्या अधिकारी आणि नेत्यांसमोर सकारात्मक चर्चा झाली. चांगल्या वातावरणात चर्चा झाली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक मुद्दे ठेवले आहेत”, असं अमित शाह यांनी सांगितलं.
सीमा प्रश्नावर भांडण करुन नाही, रस्त्यावर उतरुन नाही तर संविधानाच्या कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतो, असं बैठकीत निश्चित झालंय, असंदेखील शाह यांनी सांगितलं.काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यत कोणतंही राज्य या विषयावर कोणताही दावा करणार नाही, असं शाह यांनी स्पष्ट सांगितलं. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री एकत्रित बसतील आणि यावर चर्चा करतील. त्यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन, अशा सहा मंत्र्यांची एक समिती तयार करण्यात येईल.दोन्ही राज्यातील व्यापारी, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, सीमाभागात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी एका सिनियर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. तसेच विरोधी पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावा, राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करु नये असंही अमित शाह यांनी सांगितले.