हे अकलेचे कांदे आहेत सगळे, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर संजय राऊतांचा टोला

१० डिसेंबर २०२२


चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र, त्यावरून विरोधकांनी आता सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाकडूनही चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं जात आहे. खासदार संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला. तसेच, चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राची माफी मागावी लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.

ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात, ज्या पक्षाचे प्रवक्ते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षातला हा वंश आहे. हे अकलेचे कांदे आहेत सगळे. मग तुमच्या तिजोरीत येणारे पैसे पक्षाची भीक आहे असंच म्हटलं पाहिजे. तुम्ही जे खोके वाटले, तीही भीकच होती असं म्हटलं पाहिजे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.

ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. एकेकाळी ज्योतिराव फुलेंचं उत्पन्न हे टाटांपेक्षा जास्त होतं. त्यांनी आपली सगळी संपत्ती दानधर्मात, शाळा-कॉलेज, दलितांसाठी वापरली. त्या काळात टाटांचं उत्पन्न २० हजार होतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न २१ हजार होतं. याची इतिहासात नोंद आहे, हे यांना माहिती नाही. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील आणि महाराष्ट्राची माफी मागावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *