दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२
राज्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असून यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहेत. चिंता करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग आणून महाराष्ट्राला विकासात सर्वोच्चस्थानी नेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. येत्या काळात राज्यात होणाऱ्या सर्व औद्योगिक सामंजस्य करारांची शंभर टक्के अंमलबजावणी केली जाईल आणि विदेशी गुंतवणूकही वाढेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल, असे शिंदे यांनी सांगितले. हे सरकार लोकाभिमुख, विकासाभिमुख असेल. गेल्या तीन महिन्यांत जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून जनतेला दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. सरकार विकासकामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. हे जनतेचे सरकार आहे. करोनामुळे आर्थिक अडचणीत आलेली राज्याची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.