विश्वास टाकला तर १०० टक्के ठेवायचा अन्यथा नाही, हे माझे आजोबा बाळासाहेब नेहमी सांगायचे – आदित्य ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालंय. शिवसेनेचे नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. अविश्वास दाखविणे किंवा पाळत ठेवणे हे शिवसेनेत कदापिही होत नाही, पण ज्यांनी आत्माच विकला होता त्यांना थांबविण्यात काहीच अर्थ नव्हता, असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरीबाबत कुणकुण लागली होती. मात्र वर्षांनुवर्षे जे पक्षात होते व पक्षाने त्यांना मोठे केले, सारे निर्णय त्यांच्या मनासारखे घेतले, ते असे करतील असे कधीच वाटले नव्हते. अशांवर अविश्वास दाखविणे किंवा पाळत ठेवणे हे शिवसेनेत कदापिही होत नाही. हे बाळासाहेबांपासून चालते आले व त्यानुसारच शिवसेना पक्षप्रमुख वागले. बंडखोरांनी त्यांचा आत्माच विकला होता. म्हणून त्यांना थांबविण्यात काहीच अर्थ नव्हता.

सत्ता आल्यावर प्रत्येक मुख्यमंत्री नगरविकास खाते स्वत:कडे ठेवतो, अशी राज्यात परंपराच पडली होती. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा खंडित करीत एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते सोपविले. त्यांच्यावर पक्षाने पूर्ण विश्वास टाकला. विश्वास टाकला तर १०० टक्के ठेवायचा अन्यथा नाही, हे माझे आजोबा बाळासाहेब नेहमी सांगायचे. यांच्यावर आम्ही सारा विश्वास टाकला होता; पण यांनी घात केला, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. असो, जे घडले ते पचविताना मनाला थोड्या वेदना झाल्या; पण बरे झाले घाण गेली! पक्षाने सारे यांच्या मनासारखे केले. मंत्रीपद, विधीमंडळ पक्षनेतेपद, विरोधी पक्षनेतेपद ही सारी पदे यांनाच दिली. यांना अजून काय हवे होते? एवढे पक्षाने देऊनही त्यांनी विश्वासघात करत गद्दारी केली, असंही मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *