मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं – आढळराव पाटील
आपला आवाज न्यूज नेटवर्क
३० सप्टेंबर २०२२
शिरुर मतदारसंघातील काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटलांवर केली होती. या टीकेला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं, मी पक्षाबरोबर गेली १८ वर्ष अढळच राहिलो, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अनेक संकटं आली, अनेक वादळं आली, खूप संघर्ष करावा लागला. परंतु त्या ही परिस्थितीत शिवसेनेबरोबर, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो. गेली १८ वर्ष उद्धवजींना साथ दिली. पण १८ वर्षांच्या निष्ठेचं फळ म्हणून कुणाचं तरी ऐकून, उद्धव ठाकरेंनी माझी हकालपट्टी केली. हा सगळा प्रकार मला आवडला नाही, महाराष्ट्रालाही हा सगळा प्रकार आवडला नाही असं आढळराव पाटील म्हणाले.