नारायणगाव येथील जुन्नर रस्त्यावरील कोल्हे मळ्यातील शेतकऱ्यांनी अष्टविनायक महामार्गाचे काम केले बंद..भरपाई दिल्याशिवाय काम करू देणार नाही…
नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
अष्टविनायक महामार्ग रस्ते निर्माण अंतर्गत सुरू असलेल्या नारायणगाव ते ओझर रस्त्यावरील कोल्हेमळा येथील चारंणबाबा चौकामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी आलेल्या ठेकेदाराला जाब विचारत रस्त्याचे काम स्थानिक शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी आज बंद पाडले.
कोल्हेमळा व औटी मळा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यात अनेक वर्षांपूर्वी गेल्या आहेत. मात्र त्यांना कोणताही परतावा अथवा मोबदला अद्याप मिळाला नाही.
यासाठी आज गुरुवार दिनांक २२ रोजी दुपारी येथील शेतकरी नितीन कोल्हे, महिंद्र कोल्हे, ऍड राजेंद्र कोल्हे, रोहन शिंदे, सत्यवान कोल्हे, सावता कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, अमित औटी, गौतम औटी, भाऊ कोल्हे, बाळू औटी, दिनकर कोल्हे, सोहन शिंदे, अमोल घोडेकर,आदी शेतकरी व ग्रामस्थ यावेळी एकत्र येऊन त्यांनी अचानक सुरू करण्यात आलेल्या या रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींचे तसेच ठेकेदारांचे जवळचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ऍडव्होकेट राजेंद्र कोल्हे, शेतकरी गौतम औटी महेंद्र कोल्हे, नितीन कोल्हे यांनी स्थानिक पुढाऱ्यांना जबाबदार धरत आमचे प्रश्न त्वरित सोडवावेत अशी मागणी केली. तसेच यापुढे आमच्या जमिनींचा मोबदला मिळाल्याशिवाय ठेकेदाराला काम करू दिले जाणार नाही असे ठणकावून सांगितले.
रस्ता अरुंद असल्यामुळे सातत्याने या भागात ट्राफिक जाम ची समस्या होत असून नेहमी या भागात पाण्याची पाईप लाईन फुटणे तसेच गटार लाईन फुटणे असे प्रकार सातत्याने होत आहेत.