बेघर नागरीकांबरोबर आकुर्डीतील युवकांची भाऊबीज. श्री तुळजा माता मित्र मंडळाचा सामजिक उपक्रम
बातमीदार: रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक
पिंपरी (दि. 18 नोव्हेंबर 2020), कोरोना या जागतिक महामारीने सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे. या साथीच्या रोगाने माणसातील माणुसकी कमी झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली. परंतू या काळात सामाजिक भान जपत आकुर्डीतील श्री तुळजा माता मित्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवित इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

मंडळाचे अध्यक्ष धनंजय काळभोर यांच्याबरोबर तन्मय भालेकर आणि इतर बारा युवा मित्रांनी या वर्षीची दिवाळी वेगळ्या पध्दतीने सामाजिक उपक्रम राबवून करण्याबाबत चर्चा केली. कोरोनाबाबत शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करीत सामाजिक अंतर राखून बेघर नागरीकांबरोबर भाऊबीज करण्याबाबत ठरले.

सर्व सवंगड्यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या घरातील अतिरिक्त कपडे जमा केले. पाहता पाहता 350 कपड्यांचे जोड जमा झाले. फटाक्यांसाठी आई वडीलांनी दिलेले पैसे एकत्र जमा करुन लहान मुलांसाठी कपडे व महिलांसाठी साड्या घेतल्या, उरलेल्या पैशात सॅनिटायझर, मास्क घेण्यात आले.

भाऊबीजेच्या दिवशी सोमवारी निगडी, आकुर्डी आणि चिंचवड परिसरातील बेघर नागरीकांना तसेच चौका- चौकात भिक्षा मागणा-यांना कपडे, सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. तन्मय भालेकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या या उपक्रमात यश काळभोर, अमन यादव, यश लिमन, अभिषेक यादव, आदित्य रायरीकर, सोमदत्त काळभोर, माऊली काळभोर, शिवदत्त काळभोर, देवेंद्र कुरवार, निखिल काळभोर, अक्षय काळभोर आणि ऋषिकेश काळभोर यांनी सहभाग घेतला. युवकांच्या या सामाजिक उपक्रमाचे ज्येष्ठांनी कौतुक केले.