कारेगाव / सत्य हे सत्यच असते : मोजणी केल्यावर सगळे बाहेर येईल : विनाकारण अनु. जातीच्या लोकांना पुढे करू नये : माजी सरपंच अनिल नवले
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 07/07/2021.
सध्या शिरूर तालुक्यातील कारेगाव मधील शासकीय गायरान प्रकरण व त्यावरील अतिक्रमणे हा विषय काही थांबता थांबेना. माजी सरपंच अनिल नवले हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, शासकीय मोजणीची मागणी करत आहेत.
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील जमीन गट नंबर ६९८ जागा लोकांना दाखवून, प्रत्यक्षात मात्र शासकीय गायरान जमीन गट नंबर ७०९ मध्ये लोकांना ताबा दिलाय, ती जमीन पुन्हा शासनाला मिळावी यासाठीचे माझे भांडण आहे. माझ्या गावातील गोरगरीब समाजाची घरे काढण्याचा कुठलाही उद्देश नाही ही घरे कायम व्हावीत म्हणून मंत्रालयापर्यंत मी स्वतः सरपंच असताना पाठपुरावा केलेला आहे. मी केलेले आरोप हे बिनबुडाचे नाहीत, तर ते सत्य आहेत आणि सत्य नेहमीच कडवे असते हे लक्षात ठेवा, असा सल्लाही कारेगावचे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव अनिल नवले यांनी विरोधकांना दिला आहे.
कारेगाव, ता. शिरूर येथे शासनाची गायरान जमीन 52 गुंठे आहे. ज्या जमिनीवर गावातील काही आमच्या गावातील लोकांची घरे आहेत. या घरांचे गावठाणात रूपांतर व्हावे यासाठी मी सरपंच आसताना प्रयत्न केले आहे. मग या लोकांची घरे काढावीत असे मी कधीच म्हणणार नाही. केवळ सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठीच व आपली कातडी वाचवण्यासाठीच काही लोकांचा हा खेळ असून, यासाठी जी. प. शाळेशेजारील असणाऱ्या अवैध्य दारू विक्री करणाऱ्याला, व आणखी काही लोकांना बरोबर घेऊन शासनाला वेठीस आणण्याचे काम चालू आहे.
698 जमिनीची विक्री करून 709 या शासकीय गायरान जमिनीवर ताबा दिला आहे. शासनाची 52 गुंठे गायरान जमीनी बाबत कारेगाव येथील तलाठी यांनी 8 एप्रिल 2021 रोजी पंचनामा केला असता, त्यांच्या असे निदर्शनास आले आहे की, शेजारील गट खरेदी करून देऊन गट नंबर ७०९ सरकारी जागेत ताबा दिल्याची शक्यता त्यांनी वर्तविली असून, त्यामुळे या जागेची मोजणी करावी अशी मागणी तहसीलदार शिरूर यांच्याकडे केली असता, शिरूरच्या तहसीलदार यांनी 23 एप्रिल 2021 रोजी या जागेची मोजणी करावी म्हणून, शिरूर भूमिअभिलेख उपअधीक्षक यांना पत्र दिले आहे. काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी, इतर नागरिकांची फसवणूक करून 709 जागेवर ताबा देऊन चाळी बांधल्या आहेत, त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत, असेही माजी सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.
माझा पराभव झाला किंवा राजकीय द्वेषातून हे काम मी करतोय, हे विद्यमान ग्रा पं सदस्याचे म्हणणे चुकीचे असून, निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. मी निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीचा पावणे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. मी केवळ गावाच्या हिताचा विचार करत असतो. कुणीही गावाचे पैसे खाऊ नये,भ्रष्टाचार करू नये ही भूमिका मी कायम घेतली आहे. हे लक्षात ठेवा गावच्या हिताच्या व गावाची जमीन गावाला परत मिळावी हीच माझी प्रामाणिक मागणी आहे. जर 15 जुलैपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर शिरूर तहसील कार्यालयापुढे मी आमरण उपोषण करणार असल्याचेही, कारेगावचे माजी सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.
तसेच, विरोधकांनी सांगितल्याप्रमाणे “कारेगाव येथील प्राथमिक रुग्णालयासाठी, आंबेगाव शिरूर चे आमदार व राज्याचे गृहमंत्री यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो. परंतु कारेगाव ग्रामपंचायतीचे एक सदस्य, म्हणजेच 698 जमीन मालक यांनी प्राथमिक रुग्णालयासाठी जागा तजवीज केली आहे असे सांगितले आहे. जर सत्य असेल तर शासकीय जागा कोठे आहे, याबाबत त्यांनी जाहीर फलक लावून खुलासा करावा, असे आवाहनही माजी सरपंच अनिल नवले यांनी केले आहे.