साहित्य संमेलनामध्ये गरिबांच्या शिक्षणाविषयी चिंतन झाले पाहिजे : दिलीप वळसे पाटील

दि. २९/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : साहित्य हे आनंद, करमणुकीबरोबरच सामाजिक विचारासह गरिबांच्या व्यथा मांडणारे असावे. साहित्य संमेलनामध्ये गरिबांच्या शिक्षणाविषयी चिंतन, मनन म्हणून झाले पाहिजे. त्यामुळे आमच्यासारख्या विधिमंडळ सदस्यांना सभागृहात भूमिका मांडण्यासाठी उपयोग होईल असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  केले.

इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनात “राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान” या परिसंवादात ते बोलत होते. मोशी येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, रवींद्रनाथ टागोर विचारपीठावर यावेळी माजी आमदार विलास लांडे, संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, परिसंवादाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, स्वागत अध्यक्ष संतोष बारणे, प्रा. एकनाथ बुरसे, परिसंवादात सहभागी झालेले शिक्षक तसेच विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, कार्यकारीनी मंडळाचे अध्यक्ष संदीप तापकीर, इंद्रायणी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, विकास कंद, सचिव रामभाऊ सासवडे, सहसचिव डॉ. ए. ए. मुलानी, कोषाध्यक्ष अलंकार हिंगे, सदस्य दादाभाऊ गावडे, श्रीहरी तापकीर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

रोज नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे हे शिक्षकांपुढील मोठे आव्हान आहे. नवीन तंत्रज्ञान शिकवायचे आहे पण आपली संस्कृती आणि अध्यात्म ही त्यांना पटवून देता आले पाहिजे. आता शिक्षकांइतकीच पालकांचीही मोठी जबाबदारी आहे. तरच पुढे सुसंस्कृत आणि जबाबदार पिढीकडे घडेल. तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना स्त्रियांचा सन्मान कसा करावा हे बाल आणि षोडश वयातच सांगितले पाहिजे. स्वच्छता, पर्यावरण, गोरगरिबांना मदत करणे. स्पर्धेसाठी शिक्षण देण्याऐवजी ज्ञानासाठी शिक्षण दिले पाहिजे. मोठे पॅकेजचे पाहून विद्यार्थी घडवला जातो. त्याऐवजी “माणूस घडवणे” हे ध्येय ठेवून शिक्षकांनी काम केले पाहिजे अश्या प्रकारची विविध मते शिक्षकांनी या परिसंवादात मांडली.

परिसंवादाचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी सांगितले की, भारतात हजारो भाषा आजही अस्तित्वात आहेत. त्या बोलल्या जातात. इंग्लंड, अमेरिकेची भाषा इंग्रजी ही तेथील मातृभाषा आहे. त्या काही कोटी लोकांची इंग्रजी भाषा भारतातील सव्वाशे कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येवर लादली जात आहे. त्यामुळे भारतातील स्थानिक भाषा मातृभाषा मृतप्राय होत आहेत. मागील ७५ वर्षाच्या आधुनिक शिक्षण पद्धतीने आपल्याला खरंच कायही दिलं आहे का ? याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे. आता शिक्षकांना सर्वच कामाची जबाबदारी घ्यावी लागेल तरच सुसंस्कृत आणि सुदृढ राष्ट्र उभारणी होईल असे गिरीश प्रभुणे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन एकनाथ बोरसे यांनी केले. स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांनी स्वागत केले. आभार कार्यकारणी मंडळाचे कार्यध्यक्ष सोपान खुडे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *