सरकारी कार्यक्रमात विरोधकांवर टीका करणं कितपत शहाणपणाचं आहे?; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
१२ डिसेंबर २०२२
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुंबईती पक्षाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवारांनी सध्या राजकारणात सुरु असलेल्या विविध घटनांवर भाष्य केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींनी केलेल्या भाषणातून त्यांनी विरोधकांवर टीका केली. त्यावरून शरद पवार यांनी मोदींवर निशाण साधला, काल नागपूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होतं. या भाषणामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचं, रस्त्याचं किंवा हॉस्पिटलचं उद्घाटन करणं, हे सरकारी कार्यक्रम आहेत. सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणं, कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अशी टीका पवारांनी केली.
मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांची कार्यक्रमं पाहिली आहेत. भाषणं ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकलं आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची सरकारं असली तरी त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळलं जात नाही,असंही शरद पवार म्हणाले.