अंधेरीत जे झाले ते बरे झाले; अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२
भाजपच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली. मात्र दुसऱ्या क्रमांकाची मते नोटा या पर्यायाला मिळाल्याचे दिसून आले तब्बल १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आशिष शेलार म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीने बरेच काही स्पष्ट केलेय.भाजपा समोर आघाडीचे सोळा झाले गोळा तरी भाजपा शिवाय जिंकता येणार नाही. मतदानाची अत्यल्प टक्केवारी आणि नोटा यातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आलाय या तिघाडीला 70% मतदारांनी नाकारले. 2014 नुसार विचार केला तर आघाडीच्या उमेदवारांना 90 हजार मते मिळायला हवी होती तसे घडले नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाला मतदान करीत नाही. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईकरांचा मतदान करायला ही विरोध आणि मतपेटीतूनही प्रचंड विरोध आणि रोष समोर आलाय. अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका विजयाचे चित्र स्पष्ट झाले! जे गोळा झालेत सोळा त्यांना कवी अशोक थोरात यांच्या शब्दात आम्ही सांगतो. आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी संकटानो सावधान, गाफील मी असणार नाही!