शिवसेना फुटीला मी आणि उद्धव ठाकरे जबाबदार; शिवसेनेतील बंडखोरीवरून आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२
एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. यावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.
आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकास खातं, आम्ही त्यांना देऊ केलं होतं असे सांगत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती