मराठवाडा जनविकास संघाच्या सहकार्याने नागरिकांनी केली इर्शाळवाडीतील आदिवासी बांधवांना मदत

सातारा जिल्हा मित्र मंडळ नवी सांगवी व संस्कार प्रतिष्ठान पिंपरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक हात मदतीचा या भावनेतून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार आणि लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी पवार मित्रपरिवार यांच्या सहकार्याने दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतील आदिवासी बांधवांसाठी वस्तूरुपात मदत करण्यात आली.
यामध्ये २५ सतरंजी, ४० ब्लॅंकेट, लहान मुलांसाठी ५० स्वेटर, २० मोठे स्वेटर, लहान मुला- मुलींसाठी ७० ड्रेस, २०० साड्या, ३० बेडसीट, ५० टॉवेल, ५० नॅपकिन, २० छत्र्या या साहित्याचा समावेश आहे. ही मदत विठ्ठल चव्हाण, अजीज सिद्धकी, अण्णा जोगदंड, रणजित कानकाटे, मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार, ख्रिस्ती ऐक्य संघटना औंध रोड, श्री स्वामी समर्थ सोसायटी काळेवाडी, सूर्यकांत कुरुलकर, दिगंबर बोरावके, शेषेराव डोके, महादेव पाटेकर यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या साहाय्याने सातारा जिल्हा मित्र मंडळ व स्वरूप प्रतिष्ठानकडे सुपूर्द करण्यात आली.
सातारा जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, सचिव सोमनाथ कोरे, कार्याध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, अरविंद जाधव, लक्ष्मण माळी, संस्कार प्रतिष्ठान अध्यक्ष मोहनराव गायकवाड यांनी संत, महंत, वारकरी सांप्रदायिक मंडळी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ही मदत स्वीकारली. यावेळी ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर, ह.भ.प. धारूमामा बालवडकर, शिव कीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, ह.भ.प. आदिनाथ उर्फ नाना शितोळे, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अतुल लंगर, वामन भरगंडे, दत्तात्रेय धोंडगे, बळीराम माळी, संतोष पाटील, अनुराज दूधभाते, प्रकाश इंगोले, विष्णू फुटाणे, जगन्नाथ फुलमाळी, प्रमोद आंग्रे, सेंद्रिय शेतीतज्ज्ञ दिलीप देशमुख बारडकर, उद्योजिका प्रितीताई काळे, किरण परमार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गजानन महाराज वाव्हळ म्हणाले, की कुणी अडचणीत असेल तर समाजातील अनेक घटकांनी एकत्र येत मदतीचा हात पुढे करायला हवा. अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर म्हणाले, की समाज एकमेकांविषयी कृतज्ञता विसरत चालला आहे. प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी दुःख येते. तेव्हा कुणीतरी साद घालावी व त्याला समाजाने प्रतिसाद द्यावा. संतांनी सांगितले आहे की एकमेकांवर दया करा.
सोमनाथ कोरे म्हणाले, की सर्व वस्तू एकत्र करून ज्यांना ज्याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत पोहोच केली जाणार आहे. एकमेकांच्या हातात हात घालून समाजातील गरजूंना मदत केली तर त्यांना मोठा हातभार लागेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठ्या मनाने मदत करावी.
प्रितीताई काळे म्हणाल्या, की अरुण पवार हे प्रत्येकात ज्योत तेवत ठेवण्याचे काम करीत आहेत. अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. मात्र, घडल्या तर समाजाने एकत्र येऊन मदत करणे गरजेचे असते.
सूत्रसंचालन बळीराम माळी यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *