आम्ही घरी बसून फेसबुक लाइव्ह करत नाही” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही घरी बसून काम करणारे नाही, फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणारे नाही. आम्ही घरास,घरात, गावागावात जाऊन काम करणारे आहोत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. विकासाची गाडी सुसाट धावते आहे. सगळे अडथळे काढून टाकले आहेत. शेतीचं नुकसान झालं तेव्हा मी बांधावर नाही थेट शेतावर गेलो. तिथल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन आपल्या दारी या उपक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, तलाठी हे गावागावात जाऊ लागले आहे. सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ही दोन चाकं जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा त्या गावाचा, शहराचा त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सगळे अधिकारी चांगलं काम करत आहेत. आता कलेक्टर आणि विभागीय आयुक्तही वेगाने काम करु लागले आहेत. यामुळे काय होतं की सरकारी यंत्रणा सक्रिय होते त्याचा लाभ लोकांना मिळतो.
आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे, बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, त्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेत आहोत. कुणाचीही गैरसोय होता कामा नये हे आमचं लक्ष्य आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पनाच आम्हाला नष्ट करायची आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *