मुक्त कृषि शिक्षण केंद्राच्या ऍडव्होकेट राहुल पडवळ यांना सुवर्णपदक
नारायणगाव
( किरण वाजगे, कार्यकारी संपादक )
२८ व्या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे सन्मान
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सन २०२१ – २२ मध्ये घेण्यात आलेल्या बी.एस्सी.( ॲग्री.) या पदवी परीक्षेत नारायणगाव येथील मुक्त कृषी शिक्षण अभ्यास केंद्राच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी ॲड. राहुल प्रतापराव पडवळ यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. नाशिक येथे विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात नुकतेच त्यांना दोन सुवर्णपदके, प्रमाणपत्र आणि यशवंतराव चव्हाण स्मृती सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (परभणी) कुलगुरू डॉ. इंद्र मणी व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, सह्याद्री ॲग्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
ॲड. राहुल प्रतापराव पडवळ यांनी यापूर्वीही २०१८ – १९ खाली झालेल्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. विद्यापीठाच्या दोन्ही परीक्षांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान राहूलने पटकावला आहे. त्यांनी मातीचे आरोग्य व सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर शोध – प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता. त्यात त्यांनी प्राचीन भारतीय शेतीचा उगम , सेंद्रिय शेतीची गरज व भविष्यातील स्थान, सेंद्रिय शेती पुढील आव्हाने, सेंद्रिय व जैविक खते तयार करण्याची पद्धत, सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय व जैविक कीटकनाशन पद्धती आदी विषयांवर प्रकाश टाकला आहे. ते सध्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म च्या सेंद्रिय खत उत्पादन प्रकल्पामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून पुढील संशोधन कार्य करत आहेत.
ॲड. पडवळ यांनी याआधी विधी, कला, वाणिज्य, व्यवसाय व्यवस्थापन, पत्रकारिता इत्यादी विषयातील पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील,, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, गोवर्धन उद्योग समूहाचे चेअरमन देवेंद्र शहा , तात्यासाहेब भुजबळ कृषी संकुलाचे ( नारायणगाव) केंद्रप्रमुख डॉ. मिलिंद भुजबळ, केंद्रसंयोजक बी. आर. भुजबळ, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, व्यावसायिक विभागाचे प्रमुख डाॅ.सत्यवान थोरात, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. समीर रासकर, प्रा. मयूर जाधव, प्रा. चिराग भुजबळ यांनी राहूल पडवळ यांचे अभिनंदन केले आहे.