न्यायालयात निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे; सीमावादावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
२६ डिसेंबर २०२२
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत हजेरी लावली आहे. सीमावादाच्या मुद्य्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. कर्नाटकने सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नसल्याचा ठराव घेतलेला आह. त्यानंतर आज महाराष्ट्रातही सीमावादाच्या अनुषंगाने ठराव मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, जर ठराव करणार असाल तर हाच ठराव झाला पाहिजे, की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडींचा अत्याचार हा तिकडे थांबलाच पाहिजे. संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने ताब्यात घेऊन, आता केंद्र सरकार पालक म्हणून वागेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो.
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र हा अत्याचर भोगत आलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची संयम सुटत चालला आहे, धीर खचत चालला आहे. पण आज नाहीतर कधीच नाही या एक जिद्दीने आपण जर का उभा राहिलो नाही. तर मला वाटतं नुसती ही बडबड करण्यात अर्थ नाही असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत गेले. ते आता दिल्लीतून कधी परततील काहीच माहिती नाही. यायला निघाले आणि दिल्लीतून विमान परत बाेलावले तर ते परतही जातील.” असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.