एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं होतं; विजय शिवतारे यांचा गौप्यस्फोट

२६ डिसेंबर २०२२


विजय शिवतारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मीच एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज पेरले होते, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्यच नव्हतं, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाची बीज पेरलं, असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला. नंदनवनमध्ये साडेचार तास चर्चा करताना मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. प्रेशर करा हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या ७० सीट घालवल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसं कामाला लावली. त्यामुळे भाजपनेही शिवसेनेचे मंत्री पाडले. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झालं. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीशी सेटलमेंट झाली होती. कोणत्या सीट पाडायच्या, कोणत्या विजयी करायच्या आणि आकडेवारी कशी जुळवून आणायाची हे कट कारस्थान निवडणुकी आधीच झालं होतं. महाविकास आघाडीनंतर झाली नाही. ती आधीच झाली होती. हे फसवत आहेत, असा दावा त्यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *