चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला 1 कोटी 35 लाखांचं अनुदान – अमित शाह
१३ डिसेंबर २०२२
भारत-चीनच्या मुद्द्यावर अमित शहा म्हणाले, काँग्रेसनं राजकारण करणं थांबवावं. आमच्या सैनिकांनी ज्या प्रकारे शौर्य दाखवलं आणि आमच्या मातृभूमीचं रक्षण केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. काँग्रेसच्या काळात हजारो किलोमीटर जमीन आमच्याकडून चीननं बळकावली आहे. मात्र, सध्या भाजपचं सरकार आहे, त्यामुळं एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकणार नाही.
काँग्रेस सरकारच्या काळात चीननं भारताची हजारो हेक्टर जमीन बळकावली होती. राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-06 आणि 2006-07 या वर्षात चिनी दुतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचं अनुदान मिळालं. एफसीआरचे कायदे त्याच्या मर्यादेच्या अनुरुप नसल्याने नोटीस पाठवून कायदेशीर प्रक्रियेचं पालन करुन या फाऊंडेशनचं रजिस्ट्रेशन रद्द केलं होतं. तसंच राजीव गांधी फाऊंडेशनचं एफसीआरए रजिस्ट्रेशन रद्द करण्याचं आणखी एक कारण म्हणजे, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी फाऊंडेशला 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. या फाऊंडेशनचे कर्ताधर्ता गांधी कुटुंब आहे, त्यांनी सांगावं की, झाकीर नाईकने हा पैसा कोणत्या उद्देशाने दिला होता?
अमित शाह पुढे म्हणाले की फाऊंडेशनने आपलं रजिस्ट्रेशन सामाजिक कार्यांसाठी केलं होतं. जी रक्कम चिनी दूतावासाकडून मिळाली त्याचा वापर भारत चीन संबंधांच्या विकासाच्या शोधावर खर्च करण्यात आला, असं सांगितलं जातं. आता या शोधामध्ये 1962 भारताची जी हजारो हेक्टर भूमी चीनने हडप केली त्याचा समावेश होता का? शोध केला तर त्याचा अहवाल काय होता? पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रेमापोटी सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचा बळी गेला हा विषय शोधात होता. जर असेल तर त्याचा निष्कर्ष काय होता? असा सवाल त्यांनी केला.