कर्नाटकचे मुख्यमंत्री माज आल्यासारखे बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
१२ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मोठा वाद चालू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडलेल्या आक्रमक भूमिकेवर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना राज्य सरकार ठाम भूमिका घेत नसल्याची टीका विरोधक करत आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही बसवरा बोम्मईंनी यानं काही होणार नाही, एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका मांडली. यावरून आताउद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राला कुणी वाली आहे की नाही? – उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या बाजूने कुणीच बोलत नाहीये. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत आणि माज आल्यासारखे बोलत आहेत. आमचे मुख्यमंत्री त्यांना लिहून दिलीये तेवढीच स्क्रिप्ट वाचतात. म्हणतात सर्वोच्च न्यायालयात तो विषय आहे. मग सर्वोच्च न्यायालयातच्या निकालाची वाट जशी महाराष्ट्र बघतोय, तशी कर्नाटकने बघायला काय हरकत आहे. पण तिथे प्रकरण प्रलंबित असताना हे बेळगावला उपराजधानीचा दर्जा देत आहेत आणि डोक्यावरून पाणी गेलं तरी आम्ही थंड राहिलो आहोत. महाराष्ट्राला कुणी वाली आहे की नाही? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रात, कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकार भाजपाचेच मिंधे आहेत. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेतेही एकच आहेत. नरेंद्र मोदी. मग बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? बोम्मई म्हणतात अमित शाहांना भेटून काही होणार नाही. पंतप्रधान महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना केला.