दिल्लीच्या पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं – संजय राऊत
०७ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. काल महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आज महाराष्ट्राच्या वाहनांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे एकच संतापाचं वातावरण आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक ट्विट केलं आहे. यात त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे.
दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे.महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले.स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढपणा आहे!, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.