बिनडोक व्यक्ती पदावर नकोच, राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवा – उद्धव ठाकरे
०३ डिसेंबर २०२२
सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे. मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं नाही चालणार असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. आमची सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगलं सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आली आहे. शिवाय, घाईघाईने काही केलं असं होऊ नये म्हणून थांबलो होतो. नाही तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्र बंद व्हावा ही सर्वांची भूमिका आहे. लवकरच कार्यक्रम जाहीर करू, असेहीउद्धव ठाकरे म्हणाले.