राज ठाकरेंनी आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे – अजित पवार

०२ डिसेंबर २०२२


राज ठाकरेंनी शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवरून टोला लगावला आहे.

शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आहे. शरद पवारांचं नाव घेतलं तर ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतकं दुटप्पीही माणसाने वागू नये, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *