तालिबानी माणसाला शोभणारं वक्तव्यं हे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे – आशिष शेलार
१४ नोव्हेंबर २०२२
जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिवाय त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत आता जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.
हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंड आलं का विचारण्यासारखं आहे – शेलार
आशिष शेलार म्हणाले, आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध? चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचं स्टेशन आलं का विचारण्यासारखं आहे. जर ते निर्दोष आहेत, तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानात प्रत्येक निर्दोष व्यक्तील आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मूभा दिलेली आहे. मग जेव्हा निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल, त्यावेळी हे वेडेचाळे केले जातात. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा आणि याचा काही संबंध नाही आणि द्यायचा तर द्या ती जागाही आम्ही जिंकून येऊ. माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार, असं तालिबानी माणसाला शोभणारं वक्तव्यं हे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.” असंही शेलार म्हणाले आहेत.