अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री जबाबदारी घेणार का – आदित्य ठाकरे
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही मत व्यक्त केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री जबाबदारी घेणार का, कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, माझी, शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीच्या भूमिकेपेक्षा माझं लक्ष राज्यमंत्रिमंडळाकडे लागलं आहे. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? कारण हा पहिला प्रसंग नाही. याआधी टीईटीचा घोटाळा समोर आला आहे. ओला दुष्काळ कुठे आहे हे देखील समोर आलं आहे. स्वत:च्या मतदारसंघातील बांधावर गेलेले नाहीत. महिलेला शिवीगाळ केली. सुप्रियाताई हा विषय बाजूल ठेवा, महिला खासदार हा विषय बाजूला ठेवा, पण कुठल्याही महिलेला शिवीगाळ करणं हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनातलं लोकांसमोर आलं आहे. त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहेच, यावर उपमुख्यमंत्री काही जबाबदारी घेणार का, कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागलं आहे. कारण नुसत्या राजकीय नोटीस पाठवून चालणार नाही खरं जर महिला सुरक्षा महत्त्वाची असेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.