लोकसभा निवडणुकीपर्यंत नारायण राणेच भाजपामध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे – आदित्य ठाकरे
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२
मुंबईमध्ये फक्त भाजपाचा खासदार निवडून येईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नारायण राणेच भाजपामध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे असा टोला लगावला आहे.
दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार. मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं.आदित्य ठाकरे म्हणाले, निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. कारण जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोललेले नाहीत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. आमच्याबद्दल वाईट बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आमच्या मनात तरी असं काही नाही. अशा लोकांकडे कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो असा टोलाही त्यांनी लगावला.