दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पराभव
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१३ ऑक्टोबर २०२२
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपआधी मोठा झटका बसला आहे. दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 36 धावांनी विजय मिळवला. केएल राहुलने सर्वाधिक 74 धावा केल्या. पण पराभव टाळण्यासाठी या धावा पुरेशा नव्हत्या. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आजच्या सराव सामन्यात खेळले नाहीत. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करत 6 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 8 बाद 132 धावा केल्या.
ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल मोठी इनिंग खेळू शकले नाहीत. या सगळ्यांनीच निराशाजनक प्रदर्शन केलं. केएल राहुलने एकट्याने 74 धावा केल्या. पंत (9), दीपक हुड्डा (6) धावा करुन आऊट झाले. दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 10 धावा केल्या, अक्षर पटेलने 7 चेंडूत 2 रन्स केले. हार्दिक पंड्याने 9 चेंडूत 17 धावा केल्या.