४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं; उद्धव ठाकरेंची टीका
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२
मुंबई
४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसंच असं कृत्य करु शकतात. उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली. ज्या शिवसेनेने मोठं केलं, त्याच शिवसेनेचा घात केला. कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण गोठवलं. धनुष्यबाण गोठल्याचा आनंद महाशक्तीला आता होत खूपच असेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी साधला. निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. पण शिवसेना संकटांना घाबरणारी नाही. शिवसेना नेटाने उभी राहिल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मिंधे गटाचा भाजप पुरेपुर वापर करत आहे. त्या ४० जणांचा वापर झाला की फेकून देतील. निष्ठा ही विकत घेता येत नसते, हे परवाच्या मेळाव्यात दिसलं. भाजप शिंदे गटाचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे. काँग्रेसनेही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. तुमची बुद्धी गोठली नसेल तर, बाळासाहेबांचं नाव वापरु नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.