लम्पी ग्रस्त पशुपालकांना अर्थसहाय्य
१० नोव्हेंबर २०२२
पुणे
लम्पी मुळे आतापर्यंत तब्बल 301 जनावरे दगावली असून, त्यापैकी आतापर्यंत 292 पशुपालकांना अर्थसहाय्य करण्यात आले. उर्वरित पशुपालकांनी अर्धवट कागदपत्रे सादर केल्याने त्यांना हे अर्थसाह्य मिळाले नसून, त्यांनाही लवकरच अर्थसाह्य मिळेल, अशी ग्वाही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली. जिल्ह्यामध्ये लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत आहे. बाधित दर कमी झाला असून, बाधित जनावरांची संख्या ही 7 हजार 629 एवढी झाली आहे.
आत्तापर्यंत 8 लाख 32 हजार 912 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील लम्पी स्कीनचा आज नियंत्रणात असल्याने अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यासाठी पाच डॉक्टरांना जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. विधाटे यांनी दिली. दरम्यान, साखर कारखान्यांवर असलेल्या जनावरांसाठी कारखाना प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून कारखान्यांवरील जनावरांचेदेखील लसीकरण केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसत असून, जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर, खेड आणि बारामती तालुक्यात बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे.