स्वार्थासाठी सगळं राजकारण चाललं आहे; आई-वडिलांना शिवी देण्यासंदर्भातील चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये खालची पातळी गाठली आहे. त्यात आता भाजपा आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गुरुवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातली निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केलं. हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी मोदींना शिव्या द्यायचे. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण, मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

या विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील बोलले ही कोणती हिंदू संस्कृती आहे. हिंदू, शीख, मुस्लिम यांच्यासाठी आई-वडील श्रेष्ठ आहेत. ज्यांनी जन्म घातला, त्यांच्या अभिमान असला पाहिजे, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी मुलांवर असते. स्वार्थासाठी सगळं राजकारण चाललं आहे. हिंदू-हिंदू करत हिंदूंची मते घ्यायची आणि सत्तेसाठी दिल्लीच्या तख्तासमोर शरणागती जाणारा महाराष्ट्र नाही, असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *