तळेगांव ढमढेरे महाविद्यालयात वाडमय मंडळाचे उद्घाटन : साहित्य हेच सकारात्मक जीवन शैलीचे गमक – प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत
रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०७ ऑक्टोबर २०२२
तळेगांव ढमढेरे/शिरूर
‘जीवनावर खऱ्या अर्थाने प्रेम करायचे असेल तर युवकांनी साहित्य वाचले पाहिजे’ असे प्रतिपादन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य व शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले. तळेगांव ढमढेरे, ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजीत केलेल्या युवांकुर भित्तीपत्रक व वाड्मय मंडळ उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लळीत बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापु ढमढेरे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप सांगळे, डॉ. दत्तात्रय कारंडे, डॉ . पराग चौधरी, प्रा. कुंडलिक कदम आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. लळीत पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात वाडमय मंडळासारखे व्यासपीठ खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थी जीवनात जितके सक्रिय राहाल तितका आपला व्यक्तिमत्त्व विकास साधता येईल. तळेगांव ढमढेरे महाविद्यालयीन मराठी विभाग सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रा. डॉ. लळीत यांनी यावेळी केले. साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असते. त्यामुळे बिघडत चाललेली वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी कोणतेही साहित्य पूरक असल्याचे मतही डॉ. लळीत यांनी यावेळी व्यक्त केले.
नव्या शैक्षणीक धोरणाच्या माध्यमातून भाषा आणि साहित्याला समृद्ध करण्याची संधी युवकांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे यांनी कौशल्ये विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. पदवीबरोबरच अधिकची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली तर निश्चित जीवनाचा मार्ग सुकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप सांगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी युवांकुर या भित्तीपत्रकाची निर्मिती करणाऱ्या संपादक मंडळातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रा. डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. मनोहर जमदाडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. रवींद्र भगत, प्रा. मिनाक्षी पोकळे, प्रा. निलेश पाचुंदकर, डॉ. पद्माकर गोरे, डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. अमेय काळे, प्रा. किशोर आढाव, प्रा. अविनाश नवले, प्रा. जनार्दन गिरमकर, प्रा. श्रीपाद पाटील, प्रा. डॉ. विवेक खाबडे, प्रा. सुमेध गजबे, डॉ. अमेय काळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.