मुंबई संकटात असताना ही गिधाडं कुठे असतात; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका
आपला आवाज न्यूज नेटवर्क
२२ सप्टेंबर २०२२
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेऊन शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लक्ष्य करत त्यांचे फोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा इशारा दिला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेत्यांकडूनही उत्तरं दिली जात आहेत.
मुंबईचे लचके तोडण्यासाठी आज गिधाडे फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचून मोठे झालो आहोत. त्यावेळी अनेक आदिलशाह, निजामशाह चालून आले होते. त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह मुंबईत येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. पण कितीही जण आले, तरी आपण घाबरण्याचे कारण नाही. आपण लढायचे,’’ असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं
अमित शाह हे मुंबईत शिवसेनेला जमीन दाखवूअसे बोलून गेले. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना सडेतोड उत्तर दिलं. निवडणूका आल्यावर यांना मुंबई दिसते, मुंबई संकटात असताना गिधाडे कुठे असतात ?, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे त्यांनी केली आहे.