शिवसेनेच्या नेत्यांच्या बंडखोरी मागे शरद पवार असतात का?
अतुल परदेशी
मुख्य संपादक
२२ ऑगस्ट २०२२
जिथे जिथे राजकीय समीकरणे शिजतात तिथे तिथे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे पवारांचा हात असतोच असा अलिखित नियम तयार झालेला आहे मात्र पवारांनीच शिवसेना सुद्धा फोडली हा आरोप आता जोर धरू लागला तर समजून घेऊयात पवार यांनी खरंच शिवसेना फोडली का आणि फोडली तर कशी फोडली.
“जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवारांचा हात होता. या आरोपात किती तथ्य आहे. त्यासाठी पुन्हा इतिहासाचे पान उचकावी लागतील.1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेत पहिली मोठी बंडखोरी केली छगन भुजबळांनी. त्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना सोडून वेगळी वाट धरली. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीदरम्यान अनेक आमदार, खासदार आणि नेते सोडून गेले आहेत. केसरकर यांनी भुजबळ, राणे आणि राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्यामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केलाय. तीन दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा शिवसेनेला धक्का दिला. साल होतं 1991. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रिय होते. सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचं सरकार होतं. शिवसेना सत्तेची प्रबळ दावेदार मानली जात होती. मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि महात्मा फुलें विरोधात अवमानकारक लिहील्यामुळे भुजबळ दुखावलेले होते. त्यांनी शिवसेनेला मोठा हादरा दिला. 54 पैकी 18 आमदारांसह त्यांनी शिवसेना सोडली.
भुजबळांच्या बंडखोरी करण्यामागे पवार होते का? छगन भुजबळांच्या बंडाला शरद पवारांचा संपूर्ण सपोर्ट होता. पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भुजबळांनी पाठोपाठ राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भुजबळांच्या बंडाला पवारांचा पाठिंबा होता हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जातो. मोठे नेते नाराज नेत्यांना बंडखोरीसाठी उद्युक्त करून कुरघोडीचं राजकारण करत असतात. भुजबळांच्या बंडावेळी सत्तेच्या चाव्या फिरवण्याचं केंद्र होतं नाशिक. या बंडानंतर भुजबळांना मंत्रिपद मिळालं. पण, सहा बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत परत आले होते.
राणेंच्या बंडामागे पवारांचा हात होता का?
बंडखोरीचा दुसरा मोठा धक्का शिवसेनेला बसला जेव्हा नारायण राणेंनी पक्ष सोडला. साल होतं 2005. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती दिली आणि राणे नाराज झाले. उद्धव ठाकरेंवर आरोप करत नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.शिवसेनेत झालेली राजकीय कोंडी राणेंच्या शिवसेना सोडण्यामागचं प्रमुख कारण होतं, त्यामागे शरद पवारांचा थेट हात नव्हता असं राजकीय जाणकार सांगतात. राणे नाराज असल्याचं कळताच पवारांनी एक दार खुलं केलं होतं. राणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. यासाठी चाचपणी करण्यात आली होती. पण, नेत्यांच्या विरोधामुळे हे शक्य झालं नाही. शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत मुंबई आणि सिंधुदुर्गातील राणे समर्थकही कॉंग्रेसमध्ये गेले होते. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. बंडखोरीमागे पवारांचा थेट हात नसला तरी बाहेरून पाठिंबा नक्कीच होता. याचं कारण, शिवसेना फुटली नसती कर राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढली नसती. राणेंच्या बंडाला पवारांचं थेट नाही पण छुपं समर्थन असू शकतं याची शक्यता नाकारता येत नाहीराज ठाकरे शिवसेनेतून कोणामुळे बाहेर पडले? बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्र राज ठाकरे यांच्याहाती येतील, असं अनेकांना वाटलं होतं. राज यांची शैली, आक्रमकता बाळासाहेबांसारखी होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना राज यांच्याकडे पक्षाची सूत्र येतील असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात मवाळ स्वभावाच्या उद्धव यांच्याकडे शिवसेनेची सूत्र गेली.
राज ठाकरे शिवसेनेत प्रचंड नाराज होते. ते बाहेर पडले आणि त्यांनी 2009 मध्ये स्वत:चा पक्ष स्थापन केला. राज ठाकरेंच्या बंडखोरीमागे पवारांचा हात होता. हा आरोप खरा आहे का? राज ठाकरे यांचं शिवसेना सोडून जाणं शरद पवारांच्या दृष्टीने फूट नसून घरगुती वाद होता. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज राष्ट्रवादीत येणार का? यावर ‘या वयात बाळासाहेबांना त्रास होईल असं काही मला करायचं नाही’ असं त्यांनी सांगितलं होतं. राज यांच्या बंडाला भाजपची थोडीफार प्रमाणात फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीन गडकरी, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांसारखे नेते त्याकाळी राज यांना भेटायला येत होते.तर दीपक केसरकर यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे आपण जाणून घेतलं आणि शिवसेना फोडण्यात पवारांचा कसा हाथ होता हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर तुमच मत कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.