युवा जनता दल (से.) चे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने, PMRDA च्या जाचकते संदर्भात राज्यपालांची घेतली भेट…
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
मुंबई : दि. 11/09/2021
सध्या शिरूर तालुक्यातील जनता एका गोष्टीमुळे हादरून गेलीय, ते म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांनी, शिरूर तालुक्यातील 68 गावांचा केलेला प्रारूप विकास आराखडा यामुळे.
या विकास आराखड्यात अनेकांचा तोटा होणार असून, अनेकांची घरे, जमीन, शेती यांना बाधा येणार आहे. अनेक ठिकाणचे रस्ते, नदीची पूर रेषा व इतर बाबींमुळे अनेकांची घरे व जमिनीवर संक्रांत येणार आहे. त्यामुळे यात बाधित होणारे सर्वचजण बेचैन असून, शासनाने या सर्वांचा विचार करावा अशा आशयाचे प्रयत्न लोक करत आहेत. तर काही लोकांनी उपोषणाचा इशाराही दिला होता.
याच पार्श्वभूमीवर युवा जनता दल (से.) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी, यांची मुंबई येथील राजभवन येथे भेट घेतली. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), यांनी प्रसिद्ध केलेले विकासाचे आराखडे हे ठराविक वर्गाच्या विकास करण्यासाठी केले असून, याचा या भागातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार असून, या प्राधिकरणाने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आराखडे तयार करण्यात यावेत, अशी मागणी राज्यपाल महोदय यांच्याकडे केली आहे. राज्यपाल महोदय याबाबत सकारात्मक असल्याचे समजतेय. यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, मा. सरपंच पप्पू भोसले, मा. सरपंच विजय घावटे, ऍड. अनिल घावटे, जनता दल (से) विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे, मुबंई येथील पत्रकार भीमराव धुळप, भगवान साळवी आदी उपस्थित होते.