जुन्नर तालुक्यातील सरपंचाचे नारायणगावात रास्ता रोको आंदोलन…
नारायणगाव दि ३० (किरण वाजगे, कार्यकारी संपादक.) – वीज वितरण कंपनीकडून जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्याची सुरुवात झाल्याने जुन्नर तालुक्यातील सरपंचानी तीव्र निषेध व्यक्त्त करीत नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले .
वीज वितरणने थकबाकी नोटिसा ग्रामपंचायतीना दिल्या आहेत . काही गावाचा स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित केले असल्याने वीज वितरण अधिकाऱ्यांनी ही मोहिम थांबबावी यासाठी जुन्नर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने नारायणगाव येथे रास्ता रोको करून वीज वितरण कंपनीचे नारायणगाव विभागाचे उप कार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना निवेदन देण्यात आले . जि प सदस्या आशा बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला . यावेळी विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे , पंचायत समिती सदस्य अर्चना माळवदकर ,सरपंच राजेंद्र मेहेर, योगेश पाटे , प्रदीप थोरवे ,महेश शेळके ,दिलीप खिलारी , जंगल कोल्हे ,रमेश ढवळे ,सुभाष दळवी ,सविता गायकवाड ,अर्चना उबाळे, वैशाली तांबोळी ,माया डोंगरे ,आदी विविध गावातील सरपंच ,उपसरपंच ,सदस्य उपस्थित होते .
वीज वितरण कंपनीचे पुणे येथील अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि सर्व ग्रामपंचायतीचे बील १९६५ पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषद भरत आलेली असताना गेल्या दोन वर्षापासुन स्ट्रीट लाईटचे बील हे ग्रामपंचायतीने भरावे असे शासनाने जिल्हा परिषदेस आदेश दिले आहे. ग्रामपंचायतीला नागरिकांस पथदिवे बसवून सोई-सुविधा देणे बंधनकारक आहे. परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे ग्रामस्थ आधीच मेटाकुटिला आलेला आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर भरणा करणे ग्रामस्थांना शक्य होत नाही. ग्रामपंचायतीची सर्व विज बिले जिल्हा परिषद पुणे यांचे मार्फत भरणा करीत होते.
परंतु सध्या राज्यशासनाने १५ वा वित्त आयोगअंतर्गत हि बिले भरण्याचे आदेश काढलेला आहे.१५ वा वित्त आयोग हा केंद्र सरकार अंतर्गत येत असून निधीतील खर्च करण्यासाठी केंद्र शासनाने बंधित व अबंधित असा आदेश दिलेला असून त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने हा निधी खर्च करण्यासाठी आराखडे मंजूर देखील केलेले आहे. तसेच १५ वा वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईट बिल भरणेकामी केंद्र सरकारने कुठलाही आदेश दिलेला नाही.
त्यामुळे राज्य शासनाने पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट बिले भरावीत अशी मागणी केली आहे . ४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली . अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली .