वटपौर्णिमेनिमित्त यशस्विनी वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने वृक्षभेट : विविध ठिकाणी लोकसहभागातून लावले वृक्ष…
बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 26/06/2021.
यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन, शिरूरच्या वतीने, शहरातील विविध ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त महिलांना वृक्षदान व वृक्षरोपण करून, एक आगळी वेगळी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.
सध्या जगावर कोरोना या महाभयंकर रोगाच्या संसर्गाचे संकट असून, ऑक्सिजन कमी पडल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. वाढत्या लोकसंख्येमुळे व भयंकर झालेल्या वृक्षतोडीमुळे, वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले आहे. ते वाढावे यासाठी शासनही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेत आहे. लोकांना त्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर व वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने, महिला मंडळींनी विविध स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. शिरूरच्या नागरिकांना अधिक प्रमाणात व नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा, यासाठी नम्रता गवारी व त्यांच्या सहकारी भगिनींनी, शिरूरच्या विविध ठिकाणच्या महिलांना, वृक्ष भेट देऊन वटपौर्णिमा साजरी केलीय.
त्यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले की, “दिवसातून एका व्यक्तीला, घरगुती वापरातील ऑक्सिजनचे तीन सिलेंडर भरतील, इतका ऑक्सिजन लागत असतो. त्याप्रमाणे दरवर्षाला एका व्यक्तीला सात लाख, सहासष्ठ हजार पाचशे रुपयांचा ऑक्सिजन लागतोय. जर ती व्यक्ती 65 वर्षे जगली, तर तिला सुमारे 5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन लागतो. आणि हा ऑक्सिजन प्रत्येकजण निसर्गातून व फुकट घेतोय. निसर्गात हा ऑक्सिजन केवळ वृक्ष तयार करतात. मात्र लोक, याच वृक्षांची अतोनात तोड करतात. परंतु किमान या ऑक्सिजनचे महत्व जाणून तरी, प्रत्येकाने वृक्ष लावून त्यांची जोपासना केलीच पाहिजे. आणि याच संकल्पनेतून व शासनाच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेला छोटासा हातभार म्हणून, आमच्या महिला संस्थेच्या वतीने शिरूर शहरातील महिलांना काही वृक्ष भेट देण्यात आली असून, त्यांची लागवडही त्यांच्या त्यांच्या परिसरात करण्यात आली असल्याचे नम्रता गवारी यांनी सांगितले.”
या कार्यक्रमात वनविभागाच्यावतीने वनपाल सौ सीमा सपकाळ यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली.
तसेच, वनपाल श्री एन एस पाटील व सामाजिक वनीकरण विभागाच्या शिरूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. तनुजा शेलार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे गवारी यांनी सांगितले.
वृक्षलागवडीवेळी ज्योती गेजगे, नयना परदेशी, कल्पना सामंत, सीमा लाड, रेणुका मल्लाव, पूजा इसवे, पुर्वा सातपुते आदी महिला उपस्थित होत्या.