उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती – बच्चू कडू
३० नोव्हेंबर २०२२
दिव्यांगांसाठी काम करणं हे पुण्याचं काम आहे. पण उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती, असं बच्चू कडू म्हणालेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानलेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी अनेकदा दिव्यांगांसाठीच्या कामाचा प्रस्ताव ठेवला पण त्याला यश आलं नाही. आता शिंदे सरकारच्या काळात या कामांना गती मिळाली आहे. गुवाहाटीला गेल्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी राज्याच्या मुख्यसचिवांना फोन केला. त्यांनी सांगितलं की 29 तारखेच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये दिव्यांगांच्या मंत्रालयाचा मुद्दा चर्चिला जावा. तसंच झालं. मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करणं हा माझ्यावर एकनाथ शिंदे आणि सरकारचे उपकार आहेत. त्यांनी हा निर्णय घेऊन दिव्यांगांना न्याय दिला. मी त्यांचा कायम ऋणी राहिल, असं बच्चू कडू म्हणालेत.
3 डिसेंबरपासून या खात्याच्या कारभाराला सुरुवात होईल. यासाठी बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानलेत. “भारतातील पहिला दिव्यांग विभाग महाराष्ट्रात, आमच्या २० वर्षाच्या लढ्याला यश… हा दिवस आमच्यासाठी गौरवाचा, वैभवाचा व दिव्यांग बांधवाना गतिमान करण्याचा आहे. आम्हाला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीसयांचे मनापासून खूप खूप आभार…”, असं ट्विट बच्चू कडू यांनी केलं आहे.